महावीर क्लासेसचे काम करीत असताना इतरही अनेक संस्थांमध्ये मुला-मुलींच्या कौन्सिलिंगला मला जावे लागते. तेथे विद्यार्थी-विद्यार्थिनिंशी संवाद साधावा लागतो. त्यांची आवड, निवड व सवयी लक्षात घेवून विषयांची मांडणी करावी लागते. आजच्या मुलांचे जसे नियमित शिक्षण, अभ्यासाचे प्रश्न आहेत तसेच त्यांच्या मानसिक जडण-घडणचेही प्रश्न आहेत. आर्थिकस्तर उच्च श्रेणीत असलेल्या पाल्यांचे व अर्थिकस्तर अगदीच बेताचा असलेल्या पाल्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. आर्थिकस्तर उच्च असेल तर पालक मानसोपचारतज्ञांकडे पाल्यास घेवून जातात. परंतु, अगदीच खालच्या आर्थिक स्तराखालील पाल्यांचे मानसिक विश्व अनेक प्रकारच्या न्यूनगंडांनी भरलेले असते. असे न्यूनगंड काढायचे असतील किंवा दूर करायचे असतील तर पाल्यांशी संवाद जाणिवपूर्वक विषयांचे नियोजन करून करावा लागतो. अशाच प्रकारचा अनुभव मला जळगाव येथील महात्मा गांधी हरिजन कन्या छात्रालयातील विद्यार्थीनींशी बोलताना जाणवला.